श्रीमंत भाऊसाहेब रंगारी
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून आणि मनात क्रांतीची ज्योत सातत्याने ज्वलंत ठेऊन इंग्रजांविरोधात दोन हात करण्यासाठी सुसज्ज असे एक अग्रगण्य व्यक्तिमत्व कार्यरत होत … ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे . श्रीमंत भाऊसाहेब रंगारी म्हणजे पुण्यातील एक प्रसिद्ध अग्रगण्य व्यक्तिमत्व. श्रीमंत भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांच पूर्ण नाव. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे राजवैद्य होते . राहत्या घरी त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता.
सन १८९२ च्या सुरवातीला भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशिनाथ उर्फ नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले होते . तेथे त्यांनी तेथील संस्थानिक दरबारामध्ये सर्व प्रजेला बरोबर घेऊन गणेशोत्सव साजरा होत असताना त्यांनी बघितला व पुण्यात परत आल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी या विषयावर चर्चा केली . अगोदरच भाऊसाहेबांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यविरोधात करावयाच्या कारवायांसंदर्भात खल सुरु होता अशा पूरक वातावरणात आपले स्नेही सरदार नानासाहेब खासगीवाले यांच्या सोबत झालेल्या चर्चेमधून भाऊसाहेबांना क्रांतीची वाट आणखी सुकर झाली आणि त्यांच्या मनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मूर्त स्वरूप धारण करू लागली .
आणि भाऊसाहेबांचा विचार पक्का झाला आणि भाऊसाहेबांनी आपल्या राहत्या वाड्यात आपल्या सहकाऱ्यांची एक बैठक बोलावली , या बैठकीस महर्षी अण्णासाहेब पटवर्धन , बाळासाहेब नातू , गणपतराव घोटावडेकर , लखूशेठ दंताळे , बळवंत नारायण सातव , खंडोबा तरवडे , मामा हसबनीस , दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन इत्यादी तत्कालीन मान्यवर व्यक्ती या बैठकीस उपस्थित होत्या .